खा. शरद पवारांनी तेजस्वी यादव यांचे केले कौतुक
टीम : ईगल आय मीडिया
“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता खा.शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
अर्णब गोस्वामी अटकेवरुन राज्यपालांना टोला
पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं”.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, “आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे.”
“तेजस्वी यादव यांना निवडणुकीत जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे राष्ट्रवादी ने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोलाही यावेळी पवारांनी लगावला.