वाळूचा ट्रक स्कॉर्पिओ वर पडला : 8 जण ठार

उत्तरप्रदेशातील दुर्घटना : 2 जण जखमी झाले

टीम : ईगल आय मीडिया

उत्तर प्रदेशमधील कौशांबी ( कडाधाम ) येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास वाळूचा ट्रक स्कॉर्पिओ गाडीवर पडल्याने झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये पुरुष आणि महिलांबरोबरच लहान मुलांचाही समावेश आहे. मरण पावलेले सर्वजण एका लग्न समारंभावरुन येत होते.

ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने गाड्यांचे अवशेष आणि वाळू बाजूला काढून खाली कोणी अडकलेलं नाही ना याची तपासणी सुरु असल्याचे समजते.

वाळूने भरलेला ट्रक थेट गाडीवर कोळसल्याने गाडीतील व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि ते वाळूखाली गाडले गेले.या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या वाळू उपसण्याचे आणि अपघाताच्या ठिकाणी अन्य लोकं अडकून पडलेले नाहीत ना याची तपासणी केली जात आहे.

घटनास्थळी पोहचलेले जिल्हाधिकारी अमित सिंह यांनी आठ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.

Leave a Reply

error: Content is protected !!