मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १३ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,२९,४२४ गुन्हे नोंद झाले असून २६,६४० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ४५ लाख ६९ हजार ५५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ७८ हजार १८२ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ११ हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६५ घटना घडल्या. त्यात ८४९ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर-१ लाख ३ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०३,०१७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७३०व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,११,५०२ व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८२,१६८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील २४ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २५, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१, पालघर १ अशा ३९ पोलिस बांधवांना वीरगती प्राप्त झाली. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०० पोलीस अधिकारी व ११७७ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रिलिफ कँम्प
राज्यात सध्या एकूण १५८ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४,८६१लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.