बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘एमएस्सी’ ला मिळणार प्रवेश


अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून सुवर्णसंधी; कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती

सोलापूर : ईगल आय मीडिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत बीए आणि बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना थेट एमएस्सीची पदवी घेता येणार आहे. गत वर्षापासून संपूर्ण देशात प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या या नव्या विद्याशाखा बदल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

दहावी झाल्यानंतर कोणत्या शाखेतून करिअर करावे, याविषयी अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम असतो. यावेळी काही विद्यार्थी कला, वाणिज्य व शास्त्र तसेच तंत्रशिक्षणचा पर्याय निवडून करिअरला सुरुवात करतात. अकरावी, बारावी झाल्यानंतर पुढे बीए, बीकॉमची पदवी घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना एमएस्सीची पदवी संपादन करावी, अशी वाटते. मात्र आपल्याकडे अशी पद्धत नव्हती. कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी यापूर्वी प्रवेश मिळत नव्हता.


पायाभूत अभ्यासक्रमाचा कोर्स
बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना एमएस्सीतून पदवी घेण्यासाठी एक महिना कालावधीचा फाउंडेशन कोर्स अर्थात पायाभूत अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. पायाभूत अभ्यासक्रम करण्यासाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या कोर्सच्या माध्यमातून गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूमाहितीशास्त्र या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. फाउंडेशन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमएस्सी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. विनायक धुळप (7588384576) प्रा. सी. जी. गार्डी (7219111468) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून गेल्या वर्षापासून बीए, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना एमकॉम व एमएस्सी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासक्रम करावे लागणार आहे. त्यासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अनेक विद्यार्थी इंग्रजी व अन्य विषयातून बीएच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करतात. त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एमएस्सीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन करिअर करावयाचे असते, मात्र तशी संधी त्यांना नसते. त्यामुळे आता विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!