भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

उजनीचा विसर्ग वाढवला, कमी केला आणि परत वाढवला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरण 111 टक्के भरल्यामुळे धरणातून सोमवारी सकाळपासून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी 20 हजार क्यूसेक्स असलेला विसर्ग दुपारी 5 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी केला होता. मात्र नंतर 3 वाजता त्यात वाढ करून परत तो 10 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.

दरम्यान, भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. उजनी धरण 111 टक्के भरलेले आहे, गेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात कमी अधिक पाऊस सुरूच आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे.

सोमवारी सकाळी 20 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत होते. दुपारी यात घट करून 5 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने दुपारी 3 वाजता पुन्हा उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग 10 हजार क्यूसेक्स करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना, वीजनिर्मिती साठीही पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान सोमवारी उजनी धरण व्यवस्थापनाने भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी पत्रातील बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करून, नदी काठच्या गावातील लोकांना पात्राकडे जाण्यास मनाई करन्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!