अंगणवाडी ताई म्हणजे कोविड योद्धाच, त्यांचा योग्य सन्मान करणार

महिला व बालकल्याण विभाग मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची ग्वाही

मुंबई : ईगल आय मीडिया

राज्यभरात अंगणवाडी ताईंनी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या कोविड योद्धा आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज म्हणाल्या. मंत्री ॲड. ठाकूर यांची आज युनीसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर व श्रीमती अल्पा व्होरा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगडवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली.

यावेळी बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्याशी झूम काॅल द्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील. बंद झालेल्या लोकाभिमुख योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

बाल विवाह ही चिंतेची बाब असल्याचे सांगून ॲड. ठाकूर यांनी म्हणाल्या की, बालविवाहांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधन आणि इतर उपाय योजनांच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल. १८ व्या वर्षी अनाथगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या भविष्याकरिता ठोस कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य, आदिवासी विकास, शिक्षण, गृह असे शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधत महिला व बालकांच्या विकासासाठी रोडमॅप युनिसेफकडून तयार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!