उचलबांगडी केलेल्या पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा आरोप : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लिहिले पत्र
टीम : ईगल आय मीडिया
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतुन प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमवीर सिंग यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करीत 23 मुद्दे मांडले आहेत. या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं.
महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. मात्र प्रत्यक्षात 40 ते 50 कोटी रुपये वसूल होत होते. तर उर्वरित रक्कम अन्य मार्गाने वसूल करा असे आदेशही देशमुख यांनी दिले होते असे या पत्रात नमूद केले आहे. या पत्रामुळे राज्यात मात्र खळबळ उडाली आहे.