बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घर मालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील विठ्ठल मंदिरा जवळ असलेल्या तांबेकर गल्ली येथे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून पाच वर्षीय बालकाचा मृत्यूस कारण ठरलेल्या घरमालकास 15 दिवसानंतरही अटक झालेली नाही. दरम्यान या घर मालकाने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून शुक्रवारी त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलीसानी संबंधित घर मालकास अटक करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
ही घटना गुरुवार दि.5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता घडली. येथील तांबेकर गल्ली येथे एका जुन्या वाड्याचे पाडकाम सुरू होते तेव्हा अचानक भिंतीचा भाग रस्त्यावर कोसळला. यामध्ये गल्लीत खेळणारा पाच वर्षीय श्लोक रविंद्र घन याचा भिंतीखाली दबुन मृत्यु झाला आहे.
श्लोक च्या पालकांनी घर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानुसार गुन्हा दाखल ही झाला. मात्र त्यानंतर घर मालक अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत पसार झालेला आहे.
शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने त्या घर मालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या घर मालकाचा पोलिसांनी शोध घेऊन अटक करावी अशी मागणी मयत बालकाच्या पालकांकडून होत आहे.