नदीत मृतदेह आढळल्या नंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ
टीम : ईगल आय मीडिया
जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष, एरंडोल तालुका शेतकरी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून पाटील कुटुंबाच्या आत्महत्येचे कारन काय याची चर्चा रंगली आहे.
धरणगाव (जि. जळगाव) तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील, पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील व मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील हे तिघे जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी-१०९४) गाडीने सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. दुपारी साडेतीन वाजता ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र, ते भोदला पोहचलेच नाही.
शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून त्यांनी तापीनदीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. तिघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील(वय५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय२१) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, सायंकाळी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. त्यानतंर काल मंगळवारी (दि.१८) दुपारी ४ वाजता एक पुरूषाचा मृतदेह तापीत तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला.
राजेंद्र पाटील यांच्या कुटूंबियांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. काल सासुरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरून निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली? अतिशय समृध्द व समाधानी कुटुंब असतांना देखील त्यांनी आत्महत्या केली? तसेच राजेंद्र पाटील हे अतिशय संयमी म्हणून परिचित असतांना त्यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.