एक तास पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प
फोटो
भंडीशेगाव येथे पालखी मार्गावर बसलेले आंदोलक छायाचित्रात दिसत आहेत.
पंढरपूर ; ईगल आय न्यूज
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भंडीशेगाव ( ता. पंढरपूर ) येथील गायरान जमिनीवर मागील ५० वर्षांहून अधिक काळ राहत असलेल्या शेकडो कुटुंबांनी शनिवारी पालखी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकांना गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या आदेशा विरुद्ध ग्रामपंचायतिच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह भंडीशेगाव येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुमारे एक तास पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सुरुवातीला आंदोलन स्थळी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे व शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या प्रतिमांचे पूजन करून रस्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
भंडीशेगाव मधील साडेपाचशे कुटुंबातील सदस्य या कार्यवाहीमुळे बाधित होणार आहेत. या गायरान जमिनिवरती गोरगरीब, कामगार,भटके विमुक्त व मागासवर्गीय लोकांनी घरकुल बांधली आहेत,तसेच या ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून रस्ते,गटार,लाईट तसेच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकून करोडो रुपये खर्च केला आहे. त्याचप्रमाणे या गायरान जागेवर सरकारी इमारती बांधल्या आहेत,
यावेळी सरपंच मनीषा येलमार,पंचायत समिती चे माजी उपसभापती शिवाजी कोळवले, चंद्रभागा चे माजी संचालक राजाभाऊ माने, श्री पांडुरंग सहकारीचे संचालक गंगाराम विभूते, संतोष ननवरे, उपसरपंच विजय पाटील, नवनाथ माने, रमेश शेगावकर,रामहरी येलमार, संतोष येलमार,विश्वास सुरवसे, समाधान सुरवसे, सतीश रणखांबे,संजय रणखांबे, डॉ.श्रीधर येलमार, महेंद्र येलपले आदीसह बाधित ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडल अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.