पंकजा मुंढे बंडाचा विचार करणार नाहीत !

चंद्रकांत पाटील यांच्याकडून पंकजांच्या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

 दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर येथे विचारणा करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटील म्हणाले की, एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असं पाटील यांनी सांगितलं.

न्याय म्हणजे कोणावर तरी अन्याय होतोच. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं. राणेंना मिळालं तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात 28 जणांना घ्यायचं होतं. त्यानंतर 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे 40 जणांना घेतल होतं. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात काही चुकीचं नाही. पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केलं. तरीही या वयात त्यांनी प्रगल्भता दाखवत सांभाळलं, असंही पाटील म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!