मराठा समाजाशी दगा फटका केल्यास जबर किंमत मोजावी लागेल


खा छत्रपती संभाजीराजे यांचा ईशारा

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. मराठा समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा ईशारा खा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. बुधवारी मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यानंतर त्यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना २०२०-२०२१ या वर्षात शिक्षण आणि नोकऱ्यांत एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. हे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले असून घटनापीठाच्या निर्णयावर मराठा आरक्षणाचं पुढील भवितव्य ठरणार आहे. कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असताना व भाजपकडून याप्रश्नी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत असताना खासदार संभाजीराजे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली.

‘आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे’, असे निवेदन संभाजीराजे यांनी या निमित्ताने केले आहे.

संभाजीराजे यांनी आपल्या निवेदनातून सरकारलाही सज्जड इशारा दिला व यापुढे समाज जे ठरवेल ती माझी भूमिका असेल, असेही निक्षून सांगितले. ‘महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. मी मराठा समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीपूर्वक हे सांगत आहे, असे संभाजीराजे यांनी बजावले.

Leave a Reply

error: Content is protected !!