40 वर्षांपूर्वी बांधलेली कच्ची घरे अतिवृष्टीमुळे धोकादायक अवस्थेत
भिंत पडलेल्या घरासोबत लताबाई अणपट
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या 3 दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चिंचणी ( पुनवर्सन) या गावातील 7 प्रकल्पग्रस्तांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या पडझडी चे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चिंचणी हे गाव पिराची कुरोली गावच्या हद्दीत सुमारे 40 वर्षांपूर्वी बसवण्यात आले आहे. त्यावेळी बांधकाम करताना चाळीस वर्षापूर्वीची दगड पांढऱ्या मातीमध्ये बांधण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 7 घरांच्या भिंती पडल्या आहेत.
लता सतिश अनपट, भानुदास बापू दुदूस्कर,अशोक साहेबराव जाधव,जगन्नाथ विठ्ठल सावंत, देविदास बापू जाधव, ज्ञानेश्वर जगन्नाथ सावंत, गोविंद बापु जाधव या 7 प्रकल्पग्रस्तांची घरे पडलेली आहेत.
ही घरे कौलारू व उताराची आहेत, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या प्लॅस्टिक कागद वापरून निवारा केला असून जीव धोक्यात घालून लोक त्याच घरात राहत आहेत. या पडझडीचे पंचनामे करणे आवश्यक असून भूकंपाचे धर्तीवर मजबुत घर बांधकामासाठी भरपाई दयावी अशी मागणी होत आहे.