तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा

मुख्यमंत्र्यांनी दुर्घटना ग्रस्त तळीये गावास भेट दिली

टीम : ईगल आय मीडिया

‘तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळं तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना धीर दिला. अतिवृष्टीमुळं दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये ( ता.महाड ) गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण गावची पाहणी करून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला. अशा दुर्घटना पाहता डोंगर उतार आणि कडेकपाऱ्यांत राहणाऱ्या वाड्यावस्त्यांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात येईल,’ असं त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

‘तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल, जे काही घडलं आहे ते आक्रीत आहे. ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला पोहोचताना जवानांना आणि बचाव पथकांना अनेक अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचावकार्य करायचं होतं. राज्य शासन आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार होते. केंद्र सरकारनं देखील सहाय्य केलं. लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Leave a Reply

error: Content is protected !!