कोणी म्हणेल सिधुदुर्ग मीच बांधला

मुख्यमंत्र्यांचे नारायण राणे यांना टोले

टीम : ईगल आय मीडिया

“जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला.” असा टोला मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यावेळी प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे अनेक दिवसानंतर हे दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा हे दोघं नेमकं काय बोलणार याकडे लागल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

नारायण राणेंनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.”


“आजचा क्षण मला वाटतं आदळ – आपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. तसेच, “कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे.

आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधला सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं आहे.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!