छत्रपती खा.संभाजीराजे यांचा ईशारा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती प्रकाशव्यवस्था करण्यात आली. मात्र, या प्रकाशव्यवस्थेवर शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारतीय पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं, त्यावर पंढरपूरात ते बोलत होते.
“मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो. मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजीराजेंना टारगेट केल्यास टीआरपी वाढतो”, असा टोला संभाजीराजेंनी लगावला.
“शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली विद्यूत रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे. महाराजांचे वास्तव, समाधी असलेल्या रायगडावर अशी लायटिंग चुकीची आहे. पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी. रायगड मॉडेल प्रमाणे दहा किल्ले संवर्धनासाठी घेणार. किल्ले जतन करण्यासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. पण जतन आणि संवर्धनचा अर्थ देखील पुरातत्व विभागाला माहिती आहे का?”, असा सवाल संभाजीराजेंनी केला.
“मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.