पंढरपूरच्या संचारबंदीस हॉटेल असोसिएशन संघटनेचा विरोध

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ; अन्यथा करणार आंदोलन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

 कोरोना महामारीमुळे आधीच हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेले असून अद्याप ही ते त्यामधून सावरलेले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून सतत लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी एक लॉकडाऊनचा नवीन आदेश काढला असून शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद राहणार असल्याचा आदेश दिलेला आहे. या बंदीच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती हॉटेल असोसिएशन संघटनेचे दत्तासिंह राजपूत यांनी दिलेली आहे.

रविवारी जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस व करमाळा या पाच तालुक्यांसाठी संचार।बंदीचा आदेश काढलेला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारा हा आदेश आहे. पंढरपूर शहर व तालुक्याचा विचार केला तर शहरात रूग्ण संख्या कमी आहे व ग्रामीण भागात सुमारे 100 गावे असताना त्यातील काही गावांमध्येच कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

तालुक्यातील काही गावांमुळे संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्याला वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या गावात कोरोना रूग्ण वाढले आहेत त्या ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करावे, याचा प्रशासनाने फेरविचार करावा असेही आवाहन केले आहे.

प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट 2021 पासून आंदोलन करण्यात येणार असून दिनांक 13 ऑगस्ट नंतरही  सर्व हॉटेल व्यावसायिक आपली दुकाने चालूच ठेवणार आहोत, असा इशारा ही देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!