लॉकडाऊन शिथिल मात्र अटी व शर्ती लागू
सोलापूर : ईगल आय मीडिया
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. यामुळे शासनाने निर्बंध थिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा अध्यादेश निघाल्यानंतर सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत असून शनिवार रविवार वगळता सर्व दुकाने उद्या सोमवारपासून दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याचबरोबर सार्वजनीक वाहतुक व्यवस्था देखील सुरु राहणार आहे.
याबाबतचे नवीन आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी रविवारी काढले. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील तर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
विवाहासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी असणार आहे. रेस्टॉरंट संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंगसाठी दरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत तर पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगी देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे, यासाठी १५ दिवसांची वैधता आहे. अशा अहवालाशिवाय दुकान, व्यवसाय सुरु करता येणार नाही. असे जिल्हाधिकारी यांच्या ५ जून रोजी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.