कारखान्याच्या 17 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ
मोहोळ : ईगल आय मीडिया
लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याने प्रतीदिन ६ हजार टन ऊस गाळपाचे नियोजन केले असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निश्चींत रहावे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज सकाळी आमदार यशवंत माने यांच्या हस्ते व माजी आमदार राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत गव्हाणीत ऊसाची पहिली मोळी टाकून करण्यात आला, याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमा साखर कारखान्याचे माजी संचालक नाना डोंगरे होते.
कोरोनाच्या काळात सर्व उपस्थित मास्क लावून, सामाजिक अंतर राखून होते. त्यांना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सैनिटायझ केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, सभापती रत्नमाला पोतदार,प्रकाश चवरे, रामचंद्र क्षिरसागर,मदन पाटील, देवानंद गुंड, अॅड. राजाभाऊ गुंड, जालींदर लांडे, ज्ञानेश्वर चव्हाण, हणमंत पोटरे, अस्लम चौधरी, दीपक माळी, सज्जन पाटील, शिवाजी सोनवणे, संदीप पवार, शुक्राचार्य हावळे, संभाजी चव्हाण, अशोक चव्हाण, अनिल कादे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत येत असून मागील राज्य सरकारकडे मागणी केलेली ८ कोटी रुपये येणे असून त्यामुळे कारखान्यास व ऊस उत्पादकांना आर्थीक नुकसान सोसावे लागले. केंद्र सरकारने एफ.आर.पी. वाढविली परंतू एस.एम.पी. वाढवली नसल्यानेही कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. दरवर्षी साखर कारखान्याना नव-नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत असून कारखाना काढणे सोपे आहे. पण चालविणे अवघड झाले आहे. राजन पाटील, माजी आमदार ,
याप्रसंगी आमदार यशवंत माने, शिवाजी सोनवणे, देवानंद गुंड, अस्लम चौधरी, दीपक माळी, नाना डोंगरे आदींनी विचार व्यक्त करत कारखान्यास व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. संचालक प्रकाश चवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार मानले.