राज्यात या जिल्ह्यात लागू शकते रात्रीची संचारबंदी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

टीम : ईगल आय मीडिया

कोरोना रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र आजही देशात दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यात आज सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ इतकी आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वी केली आहे. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

केरळमध्ये ओणम या सणानंतर तेथील रुग्णांची संख्या वाढलेली दिसली आहे. आपल्यालाही आपल्या राज्यात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यातही सणांचे दिवस येत असून त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. हे लक्षात घेत राज्य सरकार केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची नक्कीच काटेकोरपणे अंमलबजावणी करेल असे टोपे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आजच्या घडीला एकूण ५२ हजार ८४४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ५१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज एकूण १३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांची ही संख्या देशात केरळ नंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे.

यासाठी महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेला वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तसेच, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर केंद्र सरकार लशीचा योग्य तो पुरवठा करेल असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितलेले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने या अनुषंगाने अनेक महत्वाच्या सूचना केलेल्या असून यात करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळणे हे पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे केंद्राने सांगितले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!