महाविकास आघाडीची वचनपूर्तीकडे वाटचाल
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
गेल्या 11 वर्षांपासून दिवंगत आम.भारत भालके यांनी पाठपुरावा करून ऑन पेपर आणलेल्या आणि मंजुरी मिळवलेल्या 35 गावच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. पोटनिवडणुकीत जरी महाविकास आघाडीचा उमेदवार निसटत्या मतांनी हरला असला तरीही महाविकास आघाडीने प्रचारादरम्यान दिलेल्या वचनाच्या पूर्तीकडे पाऊल टाकले आहे.
बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 35 गावाना शेतीला पाणी देण्याच्या दृष्टीनेच महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबाबत सर्वेक्षण सुरू झाले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगर बुद्रुक येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करण्याकडे पाऊल टाकले आहे.
2009 पासून राजकीय पातळीवर ज्वलंत असलेल्या 35 गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता सुटण्याच्या दृष्टीपथात आला आहे. 2009 पासून दिवंगत आम.भारत भालके यांनी या प्रश्नी सतत पाठपुरावा केला आणि योजना प्रत्यक्षात on पेपर आणून तिला मंजुरी ही मिळवून घेतली. मात्र या उपसासिंचन योजनेवरून अजूनही राजकीय खलबते सुरू असतात. 2014 साली जवळपास 560 कोटी रुपयाच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे भाजप सरकारने या योजनेतील 11 गावे आणि 1 टी.एम.सी.पाणी कमी करून या योजनेसाठी चा प्रस्ताव मागील नव्याने शासनास सादर करण्यात आला. दरम्यान पुन्हा राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. स्व. आमदार भारत भालके आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात या योजनेतील वगळलेली 11 गावे व 2 टी.एम.सी.पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीवर बैठक घेत जलसंपदामंत्री पाटील यांनी यास मान्यता दिली.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावामध्ये कालव्याद्वारे चा प्रस्ताव शासनास सादर केला. सध्या दोन टीएमसी पाण्याची तरतूद झाल्यामुळे लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. परंतु या सर्वेक्षणातून जर बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास ज्यादा क्षेत्र ओलिताखाली येणार असल्यामुळे आचारसंहिता संपताच सुरू झालेले सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण होणार आहे.
नारायण जोशी, कार्यकारी अभियंता उजनी लाभक्षेत्र
त्यानंतर या योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्यात येत असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस स्व. भालके यांचे निधन झाले. परंतु रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मोबाईल संदेश पाठवून पुत्र भगीरथ भालके यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्र्याकडे या योजनेसाठी लेखाशिर्ष खाते उघडणे बाबत पाठपुरावा करण्याचे सांगितले. त्यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूरला आलेल्या सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्व.भालकेच्या पाण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सुधारित प्रस्ताव शासनास सादर होणार असून या योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाने 2 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद केली आहे. बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा कृष्ण खोरे महामंडळाने काढली आहे. या सर्वेक्षणांमधून कालव्याद्वारे बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देता येणे शक्य आहे का याबाबत सर्वेक्षण सुरू झाले आहे.