मराठी साहित्यिक आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी

आंदोलनास व्यक्त केला पाठिंबा : केंद्राबाबत जाहीर केली नाराजी

टीम : ईगल आय मीडिया

गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांन आता मराठीतील दिग्गज साहित्यिकांनीही पाठींबा दर्शवला आहे. सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या साहित्यिकांनी केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचलवार, वसंत आबाजी डहाके, रा. रं. बोराडे आणि आसाराम लोमटे आदींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

“मुळात देशभरातील शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता आणि त्यांना विश्वासात न घेता ही विधेयकं केंद्र सरकारनं मंजूर केली आहेत. या कायद्याच्या माध्यमातून करार शेतीद्वारे बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करणारा, गुजराण करणारा जो शेतकरी आहे, तो हद्दपार होईल अशी शेतकऱ्यांची भावना आहे. यामध्ये कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या हमीभावाचं कवच गळून पडेल अशी भावना आहे.

मराठी साहित्यिकांची भूमिका मांडताना साहित्यिक आसाराम लोमटे म्हणाले, “केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जे तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. त्या कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जबरदस्त उठावाची भावना निर्माण झाली आहे. सगळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत एकवटले आहेत. सुरुवातीला या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधूरांच्या नळकांड्या आणि लाठी हल्ला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि अत्यंत अमानुषपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरी निर्धाराच्या जोरावर हे सर्व शेतकरी आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत.”

शेतकऱ्यांच्या या भावनेकडे साफ दुर्लक्ष करुन सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं ही बाब अतिशय अमानुष आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा असंतोष खदखदतोय. या काळात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी सुद्धा या सरकारने पार पाडलेली नाही,’ असंही लोमटे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!