जिल्हा बँक निवडणुकीवरून साताऱ्यात दोन्ही राजे यांच्यात शाब्दिक चकमक
टीम : ईगल आय मीडिया
आम्ही कोणाची जिरवण्यासाठी सातारा जिल्हा बँकेमध्ये बसलेलो नाही मतदार ठरवतील कोणाची जिरवायची आणि कोणाला जिल्हा बँकेमध्ये निवडून द्यायचं . मात्र चुकीच्या माहितीवर जिल्हा बँकेची बदनामी कोणीही करू नये, असे जोरदार प्रत्युत्तर साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा.उदयनराजे भोसले यांना दिले आहे.
तत्पूर्वी खा.उदयनराजे यांनी, बँक शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांची जिरवू नका असे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर चांगलीच टिका केली. आम्हाला कोणालाही कोणाची जिरवायची नाही आणि जिरवाजिरवीची हौसही नाही. शेवटी लोकशाही आहे. जिल्हा बँक जरी असली तरी तिला मतदार आहे. निवडून देणारे मतदार आहेत. जे काय करायचं ते मतदार करणार. त्यामुळे मी काय सांगून कोणाची जिरवाजिरवी होणार नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.
“लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला होता.
शिवेंद्रराजे म्हणाले, “उठसूठ पत्रकार परिषदा घ्या आणि उत्तर द्या असं करायची बँकेत बसलेल्या आम्हा कोणाचीच इच्छा नाहीये. पण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात राज्यात, देशात असलेल्या प्रतिमेविषयी सदस्य, शेतकरी आणि राज्यात देशात कोणता गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून उत्तर देणं भाग आहे. चेअरमन म्हणून मी प्रतिक्रिया देत आहे”.
उदयनराजेंच्या टोमण्यांबद्दल प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजे म्हणाले, “आम्हाला कोणालाही कोणाची जिरवायची नाही आणि जिरवाजिरवीची हौसही नाही. शेवटी लोकशाही आहे. जिल्हा बँक जरी असली तरी तिला मतदार आहे. निवडून देणारे मतदार आहेत. जे काय करायचं ते मतदार करणार. त्यामुळे मी काय सांगून कोणाची जिरवाजिरवी होणार नाही. त्यामुळे या जिरवाजिरवीच्या विधानांमध्ये काहीही तथ्य नाही. बँकेबद्दल जी अपुरी आणि चुकीची माहिती मांडली जात आहे, अगदी आवेशात मांडली जात आहे. त्याबद्दल स्पष्ट करणं भाग आहे. कारण बँकेची राज्यात प्रतिमा चांगली आहे. तिला बाधा पोहोचू नये म्हणून मी बँकेचा चेअरमन म्हणून उत्तर देणं भाग आहे”.