शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सोलापूर : ईगल आय मीडिया


ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजावी आणि लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.


केंद्र शासनाच्या हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती / वाडी / वस्ती मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शौचालयाचा नियमित वापर, लहान बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.स्वच्छता विषयक संदेश असलेले घोषवाक्यांचे लेखन गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजार पेठ, सरकारी दवाखाने, बस स्थानक, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक जागा अशा विविध दर्शनी भागावर करावयाचे आहे.

तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे सनियंत्रण व गावातील घोषणक्यांची तपासणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करणार आहेत. उत्कृष्ट घोषवाक्य लिहिणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे तर उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा सन्मान राज्यस्तरावर होणार आहे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

दरम्यान, घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे आणि जिल्ह्याची शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल सुरू ठेवावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!