टीम : ईगल आय मीडिया
राज्यात रविवारी आजवरच्या विक्रमी 41 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र सोमवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी नवीन रुग्णसंख्या 10 हजाराने कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३१ हजार ६४३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. रविवारच्या तुलनेत हा आकडा कमी आहे.
राज्यात रविवारी ४० हजार ४१४ रुग्णसंख्येसह आतापर्यंतचा एका दिवसातील नवीन रुग्णांचा उच्चांक नोंदवला गेला होता. त्यानंतर आज हा आकडा ३१ हजारांपर्यंत खाली आला आहे. हा काहीसा दिलासा असला तरी धोका काही कमी झालेला नाही. राज्यात आज करोनाने आणखी १०२ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ५४ हजार २८३ इतका झाला आहे. राज्यात सध्या करोनाचे ३ लाख ३६ हजार एक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ५९ हजार ४७५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
मुंबई आणि नागपुरातही करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. मुंबईत सध्या ४६ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४५ हजार ३२२ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ३५ हजार २६४, नाशिक जिल्ह्यात २६ हजार ५५३, औरंगाबाद जिल्ह्यात २१ हजार २८२ रुग्ण आहेत.