पंढरपूरसह 5 तालुक्यातील संचारबंदी उठवली

दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघडी राहणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या 5 तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली असल्याने या 5 तालुक्यातील संचारबंदी शिथिल करण्यात येत आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिली.

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटनास पालकमंत्री भरणे आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तसेच आमदार बबनदादा शिंदे, नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप गेले प्रांतअधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

पंढरपूरची वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. पंढरपूर सांगोला , माढा, माळशिरस आणि करमाळा अशा पाच तालुक्यांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदी होती. अर्थात सर्व दुकाने आस्थापना उघडण्याची मुभा होती. मात्र रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाकडून आता सहा वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची अधिसूचना जारी करण्याच्या सूचना प्रशासनास दिले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले की , पंढरपूर व आसपासच्या चार तालुक्यात मधील रुग्ण संख्या कमी होत आहे. पंढरपुरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही थोड्या प्रमाणात आहे. अशातच आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनास पंढरपूर व चार तालुक्यातील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत नव्हे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडण्यासाठी मुभा द्यावी. अशा सूचना केल्या आहेत.

पुढील आठवड्यामध्ये रुग्ण संख्या कमी झाल्यास दुकाने उघडण्याची मुभा रात्री नऊ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पुर्ववत होणार असल्याची माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. त्यामुळे निश्चितच पंढरपूर ,सांगोला ,माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील दुकाने येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुली राहू शकतात.

Leave a Reply

error: Content is protected !!