दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर दमदार आगमन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यात गेल्या जवळपास दीड महिने दडी मारलेल्या पावसाचे आज दमदार आगमन झाले आहे. दक्षिण,पश्चिम भागात दुपारी साडे तीन वाजल्यानंतर मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सुमारे अर्धा तासाहून अधिक झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.
पंढरपूर तालुक्यात गेल्या 40 ते 45 दिवस पाऊस झालाच नाही. तालुक्याच्या काही भागात अत्यल्प स्वरुपात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताक्रांत होता. मागच्या आठवड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला होता, मात्र तोसुद्धा फोल ठरल्याने तालुक्यात शेतकरी काळजीत होता.
पंढरपूर शहरासह वाखरी, भंडीशेगाव, कोठाळी, खेडभाळवणी, शिरढोन, शेळवे, गादेगाव परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
दरम्यान, आज ( सोमवारी ) दुपारी सव्वा तीन वाजल्यानंतर तालुक्यातील उत्तर-पश्चिम भागातून पावसाला सुरुवात झाली. अर्धा ते पाऊण तास मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाची अपेक्षा नसताना अर्धा तासात हवेत उकाडा जाणवला, आभाळ भरून आले आणि।पाऊस धो धो कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला असून परतीचा पाऊस दीड महिन्यातील बॅकलॉग भरून काढेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.