छत्रपती शिवरायांबाबत संरक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य !

महाराष्ट्राची माफी मागावी : संभाजी ब्रिगेड आणि खा.कोल्हे यांची मागणी

पुणे : ईगल आय मीडिया

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण ‘रामदास व दादोजी कोंडदेव’ यांनी दिले असं वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला असून राजनाथसिंह यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली तर खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी ऐकीव माहितीवर हे वक्तव्य केले असण्याची शक्यता व्यक्त केली.

व्हीडिओ पहा : रोखठोक खा. अमोल कोल्हे

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यता अमोल कोल्हे यांनी वर्तवली.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी गॅंग आहे राजनाथ सिंग यांनी सुद्धा खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिग्रेडने मांडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे आजपर्यंत कोणीही लिहिले किंवा सांगितले नाही. हा खोटारडेपणा वेळेत थांबवा. राजनाथ सिंग यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तमाम शिवप्रेमींची तात्काळ माफी मागावी अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!