खा. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी : पंढरपूर
श्री विठ्ठल मंदिरात अस्पृश्याना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी केलेल्या उपोषण लढ्यास ७५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने येथील संत तनपुरे महाराज मठात साने गुरुजी यांचे स्मारक तयार करण्यात आले असून मंगळवारी या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून यासाठी राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हभप बद्रीनाथ तनपुरे महाराज आणि राष्ट्र सेवा दलाचे राजाभाऊ अवसक यांनी माहिती दिली/
यासंदर्भात बोलताना हभप तनपुरे पुढे म्हणाले कि, साने गुरुजींनी पंढरपूरमधील श्री. विठ्ठल मंदिर समतेच्या विचाराने अस्पृश्याना खुले करण्यासाठी प्राणांतिक उपोषण केले होते. या समतेच्या लढ्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. साने गुरुजींचे ते ऐतिहासिक आंदोलन याच तनपुरे मठात झाले होते. त्याच ठिकाणी साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर वै. श्री. संत तनपुरे बाबा ३७ वा पुण्यतिथी सोहळा व संत सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा दि.०७-११-२०२२ ते ०८-११-२०२२ दरम्यान साजरा केला जाणार आहे.
सोहळ्यासाठी वै. श्री संत तनपुरे बाबा यांच्या दगडवाडी (जि. नगर) येथून विश्व एकात्मता दिंडी
व पालघड (जि.रत्नागिरी) या साने गुरुजी यांच्या जन्म गावापासून समता दिंडी पंढरपुरात एकत्र येत आहेत. वारकरी सांप्रदाय समतेची परंपरा रुजवत असताना पंढरीचा पांडुरंग अस्पृश्याना खुला नव्हता. त्यासाठी साने गुरुजींनी ०१ मे ते १० मे १९४७ या कालावधीत श्री संत कुशाबा तनपुरे महाराज यांच्या मठात प्राणांतिक उपोषण केले. या संघर्षातून श्री संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची दारे सर्वांसाठी कायमची खुली झाली आणि साने गुरुजींच्या उपोषणाची सांगता करण्यात आली. तसेच वै. श्री संत तनपुरे बाबांनी ‘भारत जोडों’ अभियानांतर्गत चारोधाम, १२ ज्योतिर्लिंग अशी संपूर्ण भारताची पद यात्रा केली. संत विचार व वारकरी सांप्रदायाचा प्रसार केला.
तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे भुकेलेल्यांना अन्नदान सेवाकार्य आणि भारतीय स्वातंत्र्य याचा अमृत मोहत्सव साजरा होत आहे. या संस्मरणीय घटनेचे औचित्य साधून श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट आणि संत सेनानी साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती हा सोहळा साजरा करीत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज, साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समितीचे अध्यक्ष राजाभाऊ अवसक, कार्याध्यक्ष श्री.ह.भ.प.अनंत महाराज तनपुरे, सचिव
दादासाहेब रोंगे, सदस्य निशिकांत परचंडराव, शिवाजी शिंदे, अशोक क्षीरसागर, सारंग
कोळी, महादेव (तात्या) कोळी, शिवाजी शिंदे, दत्तात्रय कोंडलकर, उपेंद्र टन्नु, नागेश अवताडे, दत्ता
तोडकरी, ज्ञानेश्वर बंडगर, इत्यादी प्राईश्रम घेत आहेत.