ऊस बिलासाठी विठ्ठल वर शेतकऱ्यांचे धरणे

6 महिने झाले तरी 1 रुपया मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

ऊस गाळपास देऊन 6 महिने झाले तरी एक रुपया सुद्धा मिळाला नाही, असा आरोप करीत सोमवारी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धरणे धरले आणि बिल मिळाल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान, शेतकऱ्यांनी धरणे धरले असताना कारखान्यावर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता आणि चेअरमन यांचा फोन ही लागत नव्हता. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले होते.

गुरसाळे ( ता.पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मागील हंगामात ऊस पुरवठा केलेल्या काही शेतकरी आज ( दि. 12 रोजी ) कारखान्यावर ऊस बिलासाठी गेले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या कनिष्ट अधिकाऱ्यांनी पैसे आल्यानंतर बिले दिली जातील असे सांगितले.

ऊस गाळपास देऊन 6 महिने झाले, पैसे कधी येणार ? पैसे मिळाल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. आणि धरणे धरले. बराच वेळ कार्यालयाच्या आवारात बसूनही शेतकऱ्यांची दखल घेतली गेली नाही. जबाबदार अधिकारी कारखान्यावर नव्हते आणि चेअरमन भगीरथ भालके यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाल्याचे दिसून आले.

कारखान्याने मागील हंगामात सुमारे 3 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. 15 डिसेंम्बर अखेरीस आलेल्या उसाला पहिला हप्ता 2050 रुपये दिला आहे.मात्र त्यानंतर आलेल्या ऊसाचे बिल थकीत आहे. ज्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना उचल म्हणून काही रक्कम दिली गेली असली तरीही अद्याप जवळपास 30 कोटी रुवयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे असे समजते. दुसरा हंगाम जवळ आला तरीही पैसे मिळाले नसल्याने विठ्ठल च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!