बोलेरो जीप ची ट्रॅक्टर ला जोरदार धडक
टीम : ईगल आय न्यूज
पंढरपूर ला देव दर्शनासाठी निघालेल्या बोलेरो जीप ची समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर शी जोरदार धडक झाल्याने जीप मधील ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मयत भाविक हे सरवडे सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील आहेत.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे कि, सरवडे येथील जयवंत पोवार हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. मात्र, मिरज जवळ राजीव गांधीनगर येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो (क्र. MH 09 DA 4912) चारचाकी आणि समोरून येणार विटाने भरलेला ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात झाला. या मध्ये जीप मधील ६ जण ठार झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
हे आहेत अपघाती मयत भाविक
मृतांमध्ये एक महिला, बालकाचा समावेश आहे. यात चालक उमेश शर्मा (वय ३५, रा. शेळेवाडी, मूळ गाव बिहार ) सोहम पवार ( वय १२ वर्षे ), जयवंत पोवार (वय ४५), कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) यांचा समावेश आहे. (Miraj Accident)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसांपूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर या ठिकाणी विटांनी भरलेली ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बोलेरो गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो गाडीतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत पाच जण हे सरवडे येथील (ता. राधानगरी) आहेत. या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे.
याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळताच ते तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.