पंढरपूर : ईगल आय मीडिया
मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा पाणी प्रश्न सोडवणे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास अडचणीतून बाहेर काढणे हीच भारत नानांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
सरकोली ( ता.पंढरपूर ) येथे आज दिवंगत आ.भारत भालके यांच्या तिसऱ्या दिवशीचा विधी करण्यात आला, त्यावेळी ना. जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी भारत भालके यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादन केले.
यावेळी पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की, कोरोना मुळे पंढरपूर तालुक्याची खूप मोठी हानी झाली आहे. दिग्गज माणसे कोरोनामुळे गमावली आहेत. आ.भारत नाना उपचार सुरू असतानाही विठ्ठल कारखाना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. हा प्रश्न सोडवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी आम.दीपक साळुंखे -पाटील, dvp चे प्रमुख अभिजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.