एका दिवसातील मृत्यूची संख्या केवळ 165
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात गेले काही दिवस दररोज सरासरी ३०० करोना मृत्यूंची नोंद होत होती, तो आकडा आज १६५ पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी दैनंदिन रुग्णसंख्या थेट ७ हजारापर्यंत खाली आली आहे. तर त्याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सोमवार ( दि.12 ) राज्यातील कोरोना स्थिती दर्शवणारी आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. त्यानुसार सोमवारी १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे.
सोमवारी राज्यात ७०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६४ टक्के इतका आहे. सध्या राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईतील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. आज १६२० नवीन रुग्णांची नोंद झाली तर १९६८ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. मुंबईत सोमवारी ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण २ लाख ३१ हजार ७० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १ लाख ९५ हजार ७७३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ९ हजार ४६६ जण करोनाने दगावले असून मुंबईचा रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांवर पोहचला आहे.