इसबावी विसावा ते पंढरपुर 30 वारकरी प्रत्येक पालखी सोबत पायी गेले
पंढरपुर : ईगल आय मीडिया
आषाढी एकादशी साठी पंढरीच्या वेशीवर आलेल्या वारकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखी सोबत पंढरपूर मध्ये चालत जाण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे सर्व पालखी सोहळे पंढरपूर कडे मार्गस्थ झाले आहेत.
आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून एस टी बसने आलेल्या वारकऱ्यांनी वाखरी येथे आल्यावर मात्र आक्रमक पवित्रा घेत पायी चालत सर्व 40 वारकऱ्यांसह पंढरीत जाऊ अन्यथा इथेच थांबू अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासन हवालदिल झाले होते. यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावा इथपर्यंत प्रत्येक पालखी सोबत 40 वारकरी आणि विसावा येथून पंढरपुर पर्यंत प्रत्येक पालखी सोबत 2 वारकऱ्यांना परवानगी दिली होती.
मात्र वारकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारून, जाऊ तर सर्व 40 नाही तर नाही अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस आधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे 1 तासभर विविध प्रस्तावावर चर्चा झाली मात्र वारकरी ठाम होते.
शेवटी वाखरी ते इसबावी विसावा st बसमधून आणि तिथून पंढरपूर पर्यंत 30 वारकरी प्रत्येक पालखी सोबत पायी जाण्याचा तोडगा प्रशासनाने मान्य केला.आणि वारकऱ्यानी समाधान व्यक्त करीत पालख्या पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. रात्री साडे नऊ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे वाखरीतुन प्रस्थान झाले.