कोरोना प्रभावित 11 जिल्ह्यांना दिलासा नाहीच
टीम : ईगल आय मीडिया
ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केला असून २२ जिल्ह्यांना निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. दरम्यान, कोविड पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या आणि दैनंदिन रुग्णसंख्या अधिक असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अखेर निर्बंधांमध्ये शिथीलता देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.
करोनाची संख्या वाढणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बध लावण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारने देखील म्हटले होते. या जिल्ह्यांमध्ये करोनावर पुरेसे नियंत्रण मिळालेले नसल्यानेच राज्य सरकारने या ११ जिल्ह्यांना निर्बंधातून सूट दिलेली नाही. त्याचवेळी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेला सुधारित आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आज नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार ज्या जिल्ह्यांनी करोनावर नियंत्रण मिळवले आहे, अशा राज्यातील २५ जिल्ह्यांना निर्बंध शिथिल करत दिलासा दिला आहेब. मात्र, राज्यातील उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील या अकरा जिल्ह्यांमध्ये करोनावर नियंत्रण मिळालेले नाही. या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक असून सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारने देखील राज्यातील या जिल्ह्यांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती.