उजनी : अखेर नव्वदी’चा टप्पा पार

111 टक्के कधी भरणार : पावसाचे उरले 16 दिवस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाने आज अखेर 90 टक्के पाणी साठ्याचा टप्पा पार केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. त्यामुळे धरणातील वाढ कूर्मगतीने सुरू आहे.

उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबर महिना उजाडला तरीही धरण 100 टक्के भरलेले नाही. राज्यातील बहुतांश धरणे भरून वाहू लागली असली तरीही उजनी अजूनही 90 च्या घरात अडकून आहे. धरणाची पूर्ण साठवण क्षमता 111 टक्के आहे, या हिशोबाने अजूनही उजनी भरण्यास 21 टक्के कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरते की नाही याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंडगार्डन येथे 3 हजार 280 क्यूसेक्स, दौंड येथे 3 हजार 750 क्यूसेक्स इतका आहे. धरणातील पाणी साठा 90.54 टक्के आणि उपयुक्त पाणी साठा 48.50 tmc आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यात धरणात केवळ 28 टक्के भर पडली आहे. तर गेल्या 12 दिवसात जेमतेम 7 टक्के पाणी साठा वाढला आहे.पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे. आज सकाळी धरणाने 90 टक्के ची पातळी ओलांडून 90.54 टक्के ची मजल मारली आहे.

हा महत्वाचा टप्पा गाठला असला तरी 100 टक्के कधी होणार आणि पूर्ण क्षमतेने कधी भरणार ? पावसाचे आता जेमतेम 15 दिवस उरलेले आहेत आणि परतीच्या पावसाचा जोर प.महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण 111 टक्के भरेल याबाबत आशाळभूत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!