सकाळी 2 लाख 50 हजार पातळी असेल : शहरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग 1 लाख 80 हजार क्यूसेक्स करण्यात आला असून उद्या सकाळी पंढरपूर येथे 2 लाख 50 ते 75 हजार क्यूसेक्स इतका भीमेचा विसर्ग असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे.
सध्या चंद्रभागेच्या पपात्रात 55 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग आहे. प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा ईशारा दिला आहे. आज ( बुधवारी ) रात्री साडे 8 वाजता वाजता भीमा नदीत उजनीतून 1 लाख 80 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला आहे. तर वीर धरणातून 23 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, आंबेडकर नगर झोपडपट्टी, गुरुदेव नगर या भागात प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर स्वतः जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करीत आहेत. नागरिकांना लोकमान्य विद्यालय, केंद्रे महाराज मठ, तनपुरे महाराज मठ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.
बुधवारी माळशिरस, सांगोला, पंढरपूर,माढा, मोहोळ तालुक्यातील पावसाने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे येथे चंद्रभागा नदीत सुमारे 55 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. उजनी आणि विरमधून सोडलेला विसर्ग उद्या दुपारी येथे येण्याची शक्यता असून उद्या दुपारी येथे 2 लाख 50 ते 75 हजार क्यूसेक्स इतकी पाणी पातळी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.