उल्हासनगर येथे भाजपला धक्का

22 नगरसेवकांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

टीम : ईगल आय मीडिया

उल्हासनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने कलानी गटाच्या मदतीने भाजपाला मोठा धक्का दिला असून ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवकानी आज गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे एकूण ४० नगरसेवक असून त्यापैकी ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी मधील प्रवेशानंतर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई देखील होणार नसून भाजपला या नगरसेवकांना व्हिप देखील जारी करता येणार नाही.

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या उल्हासनगर पालिकेतील २२ नगरसेवकानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे तेव्हाच ठरले होते असे समजते. त्याआधी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.


माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलानी कुटुंबातील कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपापासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले कलानी कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योती कलानी यांना अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच उमेदवारी दिली होती. काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांचे निधन झाले. आता उल्हासनगर पालिकेतील कलानी गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!