विठ्ठल’ वर हलगी नाद आंदोलनावेळी शेतकऱ्यांची मागणी !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ऊस बिले, कामगारांचे पगार, तोडणी वाहतुकीची बिले मिळावी, तसेच विविध मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्यात आले. 30 जुलैपर्यंत उसाची थकीत frp देण्यात येईल अशी लेखी हमी कारखान्याच्यावतीने देण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोन जुलै रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. सोलापूर जिल्ह्यातील थकीत FRP दहा जुलै पर्यंत नाही मिळाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला होता.
जर तुम्हाला संस्था चालू होत नसेल, तर आता सभासद आणि आम्ही शेतकरी हे आता खपवून घेणार नाहीत, कारखाना बँकेकडे जप्त झाला तर आमच्या लाखो रुपयांचे शेअर्स काय ? ऊस बिलाचं काय ? कामगारांच्या पगाराचं काय असे अनेक प्रश्न उभे आहेत. या चेअरमन आणि संचालक मंडळाने कारखाना चालू होत नसेल, तर राजीनामे द्यावेत आणि घरी बसावं. याच तालुक्यातील विठ्ठल वर प्रेम करणारे सर्व शेतकरी व सभासद मिळून हा कारखाना नेटाने चालवतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केले
विठ्ठल सह साखर कारखान्याचे सभासदाना मागील वर्षी केलेल्या उसाचे बिल अजूनही मिळत नाही, कामगारांचे पगार नाहीत, तोडणी वाहतुकीची बिलं थकीत आहेत, अशा परिस्थितीमध्ये कारखाना सुरू करण्याचे काय नियोजन आहे असा सवाल यावेळी विचारण्यात आला.
मागील बिले देण्यासोबत नवीन हंगामाचे कोणतेही नियोजन न करता शेतकरी, कामगार व कारखाना वाऱ्यावर सोडून गाढ झोपी गेलेल्या चेअरमन व संचालक मंडळींना जागं करण्यासाठी आजचा आंदोलन घेण्यात आलं असे यावेळी स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा संघटक शहाजहान शेख, विजय रणदिवे, अमर इंगळे , विठ्ठल चे माजी संचालक रायप्पा हळवणवर, धनंजय आबा पाटील, साहेबराव नागणे, पप्पू पाटील, नामू तात्या कोरके, रणजित बागल, नवनाथ मोहिते, बाहुबली सावळे, निलेश शेळके, संतोष शिंदे, दशरथ जवळेकर, सचिन आटकळे, आप्पा चोरमले, अक्षय महानवर, पांडुआण्णा नाईकनवरे, नामदेव पवार इत्यादी सह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते