पंढरपूर : ईगल आय मीडिया
रस्त्याच्या बांधकामावर मुरूम वाहतूक करणाऱ्या बेफाम टिपर ने चेंगरल्याने वाखरी ( ता.पंढरपूर) येथे एकजण जागीच ठार झाला आहे. दरम्यान या बेफाम आणि बेशिस्त वाहतुकीबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीला शिस्त नाही लावली तर ठेकेदार कंपनीची वाहने चालू देणार नाही असा ईशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे.
वाखरी येथील भागवत कृष्णा नागणे ( वय 65 वर्षे ) हे दूध घालण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना वाखरी आश्रम शाळेजवळ पाठीमागून बेफाम वेगाने आलेल्या एस एम अवताडे कंपनीच्या टिपरने उडवले. टिपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार सायकलस्वारास चेंगरून टिपर रस्त्याच्या खाली गेला. अपघात होताच टिपर चालक पळून गेला आहे.
बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष करून पोलिसांचे लक्ष्य वसुलीकडे ! या मार्गावर mit च्या जवळपास दररोज 3 ते 4 पोलीस कर्मचारी उभा असतात,मात्र त्यांचे लक्ष वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी किरकोळ कारणावरून वसुली करण्याकडेच असते. जड वाहने बेशिस्तपणे धावत असताना दिसत असूनही आजवर एकही वाहनावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. हे विशेष !
भागवत नागणे यांना उपचारासाठी दवाखान्यात आणले असताना मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वाखरी ते टप्पा या दरम्यान पालखी महामार्गाचे काम सुरू असून या मार्गावर वाहतुकीला कसलीही शिस्त नाही. अरुंद रस्त्यावरून बेशिस्त आणि बेफाम वाहतूक चालत असल्याने दुचाकीस्वारासह छोट्या वाहनांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या मार्गावरील जड वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत अन्य मार्गे वळवण्यात यावी, वाहनांच्या वेगाला मर्यादा हवी अन्यथा वाहतूक बंद पाडू असा ईशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे.