सरपंच पदासाठी आरक्षण बदलल्याने कही खुशी तर कही गम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील 91 गावच्या सरपंच फेर सोडतीवेळी आरक्षण बदलल्याने करकम्ब, गादेगाव, सरकोली,वाखरी, पटवर्धन कुरोली, नारायण चिंचोली अशा गावांमध्ये समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्यांचं आरक्षण बदललं ते काहीसे निराश आणि ज्यांचं निघाले ते खुश असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान भाळवणी, खर्डी, भोसे, वाडी कुरोली, सुस्ते अशा गावांचे आरक्षण बदलले नाही त्यामुळे त्या गावातील इच्छुकांनी अधिक नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील 94 ग्रामपंचायत सरपंच पदाचे 27 जानेवारी रोजी आरक्षण काढले होते मात्र काही गावातील लोकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. अखेरीस 3 गावांचे आरक्षण कायम ठेवताना 91 गावांचे फेर आरक्षण काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे 22 फेब्रुवारी रोजी फेर आरक्षण सोडत काढण्यात आली.
यामध्ये करकम्ब चे आरक्षण अगोदर obc महिला होते ते obc पुरुष झाले. तर सरकोली येथील आरक्षण अगोदर सर्वसाधारण महिला होते तिथे बदल होऊन सर्व साधारण पुरुष झाले आहे. सरकोलीत अगोदर 3 महिला पदासाठी इच्छुक होत्या आता सर्वसाधारण झाल्याने 5 पुरुष बाह्या सारून पुढे आले आहेत. याउलट वाखरी येथील सर्वसाधारण असलेले आरक्षण बदलून सर्वसाधारण महिला झाले आहे. त्यामुळे इथं अगोदर 4 ते 6 जण इच्छुक होते त्यांची संख्या घटली असून आता 3 ते 4 महिलांची नावे चर्चेत आली आहेत. पटवर्धन कुरोली येथील सर्वसाधारण महिलेसाठी असलेले आरक्षण बदलून सर्वसाधारण झाले आहे. तरीही इच्छुक महिला सदस्यांनी सर्वसाधारण जागेवरून सरपंच होण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
गादेगाव चे आरक्षण अनु जाती महिलेसाठी राखीव होते ते बदलून आता सर्वसाधारण महिला झाले आहे. इथे अनु जाती प्रवर्गातील एकमेव महिला सदस्या होत्या त्यांची संधी तूर्तास तरी गेली असून आता आशा पल्लवित झालेल्या महिला पुढे सरसावल्या आहेत.
तालुक्यातील लक्षवेधी निवडणूक झालेल्या नारायण चिंचोली येथे सत्तेचे पारडे पुन्हा फिरवणारे आरक्षण पडले आहे. 27 जानेवारी रोजी नारायण चिंचोली चे आरक्षण sc महिला निघाले होते. मात्र त्या गटातील सदस्य बहुमत मिळलेल्या पॅनल कडे नव्हते. फेर सोडत काढल्यानंतर आरक्षण बदलुन obc साठी निघाले आहे. त्यामुळे इथं पुन्हा ज्या गटाला बहुमत मिळाले आहे, त्या परिचारक गटाचा सरपंच होणार आहे.
तालुक्यातील भाळवणी, खर्डी, भोसे, कासेगाव अशा मोठ्या गावांचे आरक्षण मात्र बदलले नाही. त्यामुळे त्या गावातील सरपंच पदासाठी चुरस आहे.